बोधकथा - मनाची एकाग्रता - Moral Story
एक तरुण साधूच्या आश्रमात गेला. त्याने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, 'साधू महाराज, मी प्रभूच्या प्राप्ती करता पुष्कळ तपश्चर्या केली; परंतु तो मला काही भेटला नाही. असे का? देवाच्या प्राप्तीकरिता मी आणखीन किती तपश्चर्या करू?'
साधू महाराज म्हणाले, 'देवप्राप्ती होईल; पण त्याला तुझी मनाची एकाग्रता असली पाहिजे. उदाहरणच हवे असेल तर ऐक. मी काल फिरत फिरत एका वाड्याजवळ गेलो होतो., वाड्याशेजारीच त्या मालकाची एक सुंदर अशी बाग होती.
त्या झाडांना पाणी घालायचे म्हणून जवळच्या विहिरीतील पाणी तेथील माळी काढत होता; पण ते दृश्य पाहून मला हसू आले. कारण तो जी बादली विहिरीत सोडत होता, ती वर येईपर्यंत रिकामीच व्हायची. कारण विहिरीत सोडत असलेल्या बादलीस खूपशी छिद्रे होती. ती वर येईपर्यंत रिकामीच व्हायची.
पाणी भरून घेण्यासाठी कितीही कष्ट घेतले तर ती रिकामीच येणार प्रथम बादली ठीक करून घ्यायला हवी. मनाचेही तसेच आहे. ध्यान धारणा, देवाची प्रार्थना करण्यासाठी लोक बसतात खरे; पण त्यांचे मन इकडे तिकडे भटकत असते.
मनाची एकाग्रताच देवप्राप्ती करून देते. मन एकाग्र नसेल तर नुसतीच तपश्चर्या करून काय उपयोग?'
तात्पर्य : मनाच्या एकाग्रतेशिवाय फलप्राप्ती नाही.
No comments:
Post a Comment