बोधकथा - लोभी - Moral Story
एकदा कृष्णा नदीला पूर आला होता. पूर पाहाण्यासाठी दोन्ही तिरावर लोकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये चिकटपंतही उभे होते. इतक्यात कोणीतरी ओरडले, अरे ते पाहा घोंगडे चालले आहे. चिकटपंत नावाप्रमाणे चिक्कू, चिकट आणि लोभीही. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली. ते घोंगडे तसे काही लांब नव्हते. चार हात पोहल्यावर ते त्यांच्या हातात आले; पण थोड्याच वेळाने ते ओरडू लागले. अहो कुणीतरी मला वाचवा.
काठावरील लोक ओरडायला लागलीच. अहो ते घोंगडे तुम्हाला खेचून आणता येत नसेल, तर सोडून द्या ना. पाण्यात घोंगडे भिजल्यामुळे ते वजनदार झालेच असणार. मग कशाला हवे आहे. सोडून द्या आणि या काठावर.
यावर चिकटोपंत म्हणाले, अहो, हे घोंगड नाही तर चक्क अस्वल आहे. मी त्याला पकडले नसून, त्यानेच मला पकडले आहे. हे ऐकून काठावर असणारे पट्टीचे पोहणारे चार-पाच युवक पाण्यात उतरले आणि त्या अस्वलाच्या तावडीतून चिकटोपंतांची सुटका केली. अस्वलालाही कसेबसे तिरावर आणले. मग तेथे जमलेले लोक म्हणाले, अहो चिकटोपंत खुप जास्त लोभापायी आज तुमचा जीव जात होता. आता तरी शहाणे व्हा.
तात्पर्य ; अतिलोभ कधी कधी जीवावरही बेतू शकतो.
No comments:
Post a Comment