बोधकथा - पापमुक्त - Moral Story
एकदा एकनाथ महाराजांना एका गृहस्थांनी विचारले, 'महाराजा,आपले जीवन किती साधे, किती निष्पाप आहे. आमचे मात्र असे का?' एकनाथ महाराज थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, 'माझी गोष्ट तूर्तास तरी राहू दे. तुझ्याविषयी कळलेली गोष्ट सांगतो. गोष्ट फारच वाईट आहे. अगदी तुझ्या जीव्हारी लागणारी आहे, पण सत्य ते स्वीकारावेच लागेल. तू आजपासून सात दिवसांनी मरणार आहेस.'
हे ऐकून तो गृहस्थ अस्वस्थ झाला. फक्त सात दिवसांनी मरण, अवघे एकशे अडुसष्ट तास बाकी. त्याला काही सुचेना. तो आजारी पडला. अंथरुणावरच त्याचा दिवस जाऊ लागला. सातव्या दिवशी नाथांनी विचारले, 'कसं काय?' यावर तो म्हणाला, 'कुठलं काय महाराज, जातो आता.' यावर नाथ म्हणाले, 'या सात दिवसात किती पापकर्म केलीस?'
तो मनुष्य म्हणाला, 'पापाचा विचार करावयास वेळच मिळाला नाही. सारखं डोळ्यांसमोर मरण येत होतं.' नाथ म्हणाले, 'आमचं जीवन निष्पाप का याचं उत्तर तुला मिळालं ना?'
तात्पर्य : मरणाचे स्मरण नेहमी ठेवणे हाच पापापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे.
No comments:
Post a Comment