बोधकथा -परमेश्वराचा दृष्टीक्षेप- Moral Story
रामपूर नावाचे गाव होते. त्या गावावर कर्मकांड आणि अंधश्रद्धेचा खूपच पगडा होता. सगळे गाव धर्ममार्तडांच्या अधिपत्याखाली होते. या सनातनी लोकांनी गावावर अनेक निर्बंध लादले होते. लोकांना कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्याची, अगर त्यात भाग घेण्याची बंदी होती.
एकदा एक नाटकमंडळी त्या गावात आली. गावातील निर्बंधमुळे त्या लोकांना गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवरच अडवले;पण नाटकाचा निर्माता हुशार होता. त्याने कुणालाही न जुमानता नाटकाचा प्रयोग गावात करायचाच असा निश्चय केला. त्याने गावात तळ ठोकला.
नाटक पाहायचे नाही, असा निर्बंध असल्यामुळे भीतीने लोक नाटक पाहायलाच जात नव्हते; पण तरीही नाटकाची जाहीरात रोज त्या गावात केली जात होती. त्याचा परिणाम एके दिवशी दिसून आला. एक दिवस खुद्द तेथील धर्ममार्तंडालाच नाटक पाहावेसे वाटले; पण आपणचा काढलेला आदेश कसा मोडायचा? शिवाय लोक काय म्हणतील? हाही प्रश्न त्याच्यासमोर होता. म्हणून त्याने त्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाकडे एक चिठ्ठी पाठविली.
'मला कोणीही पाहणार नाही, अशा दरवाजातून आत घ्याल का?' यावर व्यवस्थापकाने त्यांना उत्तर दिले, 'परमेश्वराच्या दृष्टीला पडणार नाही, असा एकही दरवाजा या नाट्यगृहाला नाही.'
तात्पर्य : सत्याचा वाटा, पळवाटा, आडवाटा नसतात. सत्य ते सत्यच, ते कधीही चुकविता येत नाही.
No comments:
Post a Comment