बोधकथा - आसक्ती
एकदा एक भिकारी, संत समजल्या जाणाऱ्या महात्माला भेटावयास गेला. तो संत एका अलिशान बैठकीवर बसला होता. त्या बैठकीवर लोंबकळत असलेल्या सोन्याच्या लडीला धरूनच तो सर्वांशी बोलत होता. हे पाहून भिकारी म्हणाला, 'मी भलत्या ठिकाणी आलो असे वाटते.
आपण श्रेष्ठ संत की सुखोपभोग घेणारे लालची? मला हे राजवैभव, हा थाट पाहून खूप वाईट वाटतंय.' तेव्हा तो संत म्हणाला, 'मी ह्या क्षणी सर्व वैभव सोडून तुझ्याबरोबर यायला तयार आहे. चल, असे म्हणून तो त्या भिकाऱ्यासोबत अनवाणी चालूही लागला.
काही अंतर गेल्यावर तो भिकारी म्हणाला, 'महाराज, माझं भिक्षापात्र आपल्या गादीवरच राहिलं. आपण इथं थांबा. मी ते घेऊन येतो.' हे ऐकून तो संत म्हणाला, 'मित्रा, तुझा जीव तर साध्या भिक्षापात्रात अडकून पडला आहे. मी तर सारं वैभव सोडून आलोय. मग सांग विरागी कोण? तू का मी?
अरे, मी जरी सोन्याच्या लडीला धरलं असलं तरी माझ्या नावेच्या दोरीची खुंटी माझ्या हृदयातच नव्हे तर जमिनीतच घट्ट रोवली आहे,'
तात्पर्य : संसारात असणे ही आसक्ती नव्हे तर संसार मनात असणे ही आसक्ती.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق